पाकिस्तानचा आठ दिवसांसाठी NOTAM जारी   

इस्लामाबाद : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन 'सिंदूर' राबवले. त्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल सैन्य कारवाई सुरु केली. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतर पुढील ४ दिवस तणावाचे होते. आता संघर्ष थांबल्यानंतर, दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानला झालेल्या नुकसानाची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानी हवाई तळांना, रडारला झालेल्या नुकसानाची माहिती भारताच्या तिन्ही दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल दिली. पाकिस्तानचे हवाई तळ, लष्करी तळ, दहशतवाद्यांचे 'लॉन्च पॅड' यांचे कारवाई आधीचे आणि नंतरचे फोटो काल सैन्य दलांनी दाखवले. 
 
यानंतर पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील महत्त्वाचा आणि प्रतिष्ठित असा 'रहीम यार खान नूर एअरबेस' आता कार्यान्वित नाही. भारताने  प्रत्युत्तरा दाखल केलेल्या कारवाईत विमानतळाच्या धावपट्टीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता पाकिस्तानने रहीम यार खान नूर एअरबेस आठवड्याभरासाठी बंद केला आहे. त्यामुळे पुढील सात दिवस हा हवाई तळ कार्यान्वित नसेल. या संदर्भातील नोटम (NOTAM) पाकिस्तानने जारी केले. पाकिस्तान नागरी उड्डाण प्राधिकरणाने ही नोटिस शनिवारी संध्याकाळी जारी केली. १० मे च्या संध्याकाळी ४ वाजल्यापासून नोटम (नोटिस टू एअरमॅन) लागू झाला आहे. १८ मेच्या संध्याकाळी ५ पर्यंत तो लागू असेल. याचा अर्थ या कालावधीत रहीम यार खान नूर एअरबेस बंद असेल.
 
हवाई दलाच्या तळावर काम सुरु असल्याने तो बंद ठेवण्यात येत असल्याचे पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने म्हटले. पण भारतासोबतचा तणाव कायम असताना, शस्त्रसंधी नुकतीच झालेली असताना सैन्याच्या हवाई तळावर काय काम केले जाते, ते सांगणे पाकिस्तानने टाळले आहे. सध्याच्या घडीला हवाई तळावरुन उड्डाणे होणार नाहीत, असे त्या नोटममध्ये नमूद केले.

Related Articles